कर्ज माफी

अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीपोटी केवळ १ हजार ८५१ कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. सभागृहात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी शेतकरी प्रश्नावर प्रस्ताव दिला होता. त्यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी, धानासाठी दोन हेक्टरच्या मयदित १५ हजारांऐवजी २० हजार रुपये मदतीची घोषणा केली. तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृती दलाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेचे पोर्टल सुरू करण्यात येणार असून साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आपल्या सरकारने केवळ एक रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय घेतला आणि पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत तब्बल १७७ टक्के वाढ झाली आहे. एक कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत विक्रमी सहभाग नोंदविला. राज्य सरकारने त्यासाठी ५१७४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सध्या अग्रिम रकमेसाठी विमा कंपन्यांकडून २ हजार १२१ कोटी रुपये इतकी रक्कम मंजूर करण्यात आली. त्यापैकी १२१७ कोटी रुपयांची अग्रिम वाटप करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. या भाषणादरम्यान त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. ‘आम्ही बांधावर जाऊन पाहणी करतो, घरात बसून फेसबुक लाइव्ह करत नसल्याचा टोला त्यांनी लगावला.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या नुकसानीचे प्राथमिक पंचनामे जवळपास सुरू आहेत. ३२ जिल्ह्यांपैकी २६ जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झाले असून परभणी, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया आणि चंद्रपूर या सहा जिल्ह्यातील पंचनामे थोडेफार बाकी आहेत. आतापर्यंत ९ लाख ७५ हजार ५९ हेक्टरचे क्षेत्र बाधित झाले आहे. यासाठी अंदाजे दोन हजार कोटींची मदत द्यायची आहे. जसजसे पंचनामे होतील तसतशी मदत ‘डीबीटी’द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

विरोधी पक्षाकडून आरोप

मुख्यमंत्री शिंदे जुन्याच घोषणा व आकड्यांचा खेळ करून शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून पळ काढत आहेत. ‘अग्रिम’च्या नावाखाली शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात आला नाही. आता शेतकऱ्यांना १५५३ रुपयांची अग्रिम दिल्याचे सांगण्यात आले. ही रक्कम त्यांना खूप मोठी वाटत असेल तर मुख्यमंत्री, कृषिमंत्री आणि एकूणच मंत्रिमंडळ शेतकऱ्यांबाबत सरकार किती संवेदनशील आहे? हे यावरून दिसून येते असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले.