Board Exam: दहावी-बारावीच्या परीक्षेच्या वेळेसंदर्भात बोर्डाचा मोठा निर्णय

Maharashtra Board Exam : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही परीक्षांसाठी 10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाणार आहे. पेपरफुटी आणि कॉपीचे प्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एखाद्या पेपरसाठी 3 तासांचा वेळ देण्यात येत असेल तर यंदा हा वेळ 3 तास 10 मिनिटांचा असणार आहे.

 

10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ कशासाठी?

यापूर्वीही बोर्डाच्या परीक्षांमध्ये 10 अतिरिक्त मिनिटं ही निर्धारित वेळेच्या आधी वाढवून दिली जायची. म्हणजे 11 चा पेपर असेल तर 10.50 पासून तो सुरु व्हायचा. प्रश्नपत्रिकेचं आकलन करण्यासाठी हा वेळ वाढवून दिला जात होता. मात्र अनेक कॉपी प्रकरणं समोर येण्याचं प्रमाण हे चिंताजनक होतं. अनेकदा पेपर फुटल्याच्या अफवाही पसरल्या होत्या. त्यामुळेच आता बोर्डाने मागील वर्षाप्रमाणे यंदाही पेपरचा कालावधी संपल्यानंतर निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटं अधिक वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे.

 

अर्धा तास आधी पोहचा

मात्र परिक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावं लागेल, अशा सूचना बोर्डाने दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांची संपूर्ण तपासणी करुनच त्यांना परीक्षा केंद्रांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे वेळेआधी विद्यार्थ्यांनी केंद्रावर पोहचावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment